सर्वेपल्ली राधाकृष्णन
भारतीय राजकारणी व भारतीय तत्त्वज्ञ,दुसरे राष्ट्रपती / From Wikipedia, the free encyclopedia
सर्वपल्ली राधाकृष्णन (तथा सर्वपल्ली राधाकृष्णय्या; [2] ५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) हे एक भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि १९५२ ते १९६२ पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. ते १९४९ ते १९५२ पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. तसेच १९३९ ते १९४८ पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते.
राधाकृष्णन | |
२ रे भारतीय राष्ट्रपती | |
कार्यकाळ मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[1] | |
मागील | राजेंद्रप्रसाद |
---|---|
पुढील | झाकीर हुसेन |
कार्यकाळ १९५२ – १९६२ | |
जन्म | सप्टेंबर ५, इ.स. १८८८ तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत |
मृत्यू | एप्रिल १७, इ.स. १९७५ |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | सिवाकामुअम्मा |
अपत्ये | पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल |
व्यवसाय | राजकारणी, तत्त्वज्ञ, प्राध्यापक |
धर्म | वेदान्त (हिंदू) |
राधाकृष्णन हे विसाव्या शतकातील तुलनात्मक धर्म आणि तत्त्वज्ञानाचे सर्वात प्रतिष्ठित विद्वानांपैकी एक होते. [3] [web 1] ते १९२१ ते १९३२ या काळात कलकत्ता विद्यापीठातील किंग जॉर्ज पंचम मानसिक आणि नैतिक विज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील पूर्व धर्माचे स्पॅल्डिंग चेअर आणि नैतिकता विभागाचे १९३६ ते १९५२ पर्यंत ते अध्यक्ष होते. [4]
राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते. त्यांनी या परंपरेची समकालीन आकलनासाठी पुनर्व्याख्या केली. [web 1] ज्याला ते "अज्ञात पाश्चात्य टीका" म्हणायचे, त्याच्यापासून त्यांनी हिंदू धर्माचा बचाव केला. समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले. [5] भारत आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. [6]
राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९३१ मध्ये नाइटहूड, १९५४ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि १९६३ मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल केले गेले. हेल्पेज इंडिया या भारतातील वृद्ध वंचितांसाठी एक ना-नफा संस्था असलेल्या संस्थापकांपैकी ते एक होते. राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की "शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत." १९६२ पासून, त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. [web 2]