भारतामधील रेल्वे वाहतूक
From Wikipedia, the free encyclopedia
रेल्वे वाहतूक हा भारत देशामधील दळणवळणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रवासी तसेच मालवाहतूकीमध्ये देशात अग्रेसर असणारी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीखालील भारतीय रेल्वे देशात रेल्वेसेवा पुरवण्यासाठी जबाबदार आहे. २०२० साली सुमारे ८०९ कोटी प्रवाशांनी भारतात रेल्वे प्रवास केला तसेच ह्याच काळात सुमारे १२१ कोटी टन मालवाहतूक रेल्वेद्वारे करण्यात आली. सद्य स्थितीमध्ये भारतामधील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असून २०२० सालापासून काही प्रवासी व मालवाहतूक मार्गांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२०२० साली भारत देशामध्ये ६७,९५६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे होते. ह्या बाबतीत भारताचा जगभरात [[अमेरिका], रशिया व चीन खालोखाल चौथा क्रमांक लागतो. भारतामधील रेल्वे वाहतूक प्रामुख्याने ब्रॉड गेजवर केली जाते व एप्रिल २०२१ मध्ये ४५,८८१ किमी लांबीच्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. भारतीय रेल्वेकडे आजच्या घडीला २,९३,०७७ मालवाहतूक करणाऱ्या वाघिणी, ७६,६०८ प्रवासी डबे तर १२,७२९ इंजिने आहेत.